नवी मुंबई :- स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सातत्याने आपले मानांकन उंचावणारे शहर म्हणून नवी मुंबई शहर नावाजले जाते. 'स्वच्छ सर्वेक्षण 2023' मध्येही देशातील व्दितीय क्रमांकाचे (तांत्रिकदृष्ट्या तृतीय) स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेस मानांकन लाभले आहे. त्याचप्रमाणे कचरामुक्त शहराचे सर्वोच्च 'सेव्हन स्टार' रेटिंग आणि ओडीएफ कॅटेगरीमध्ये सर्वोच्च 'वॉटर प्लस' रेटिंग देखील नवी मुंबई महानगरपालिकेने प्राप्त केलेले आहे.
या अनुषंगाने 'स्वच्छ सर्वेक्षण 2024' चे टूलकिट प्रकाशित करताना शहरी विकास मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी 'स्वच्छ सर्वेक्षण 2024' करिता आजवरच्या स्वच्छ सर्वेक्षणात सातत्याने अग्रक्रमावर राहिलेल्या उच्चत्तम शहरांकरिता 'सुपर स्वच्छ लीग' ही नवीन विशेष कॅटेगरी निर्माण करीत असल्याची घोषणा केली. यामध्ये लोकसंख्येच्या आधारावर शहरांच्या पाच श्रेणी निवडण्यात आल्या. त्यामधील दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या देशातील प्रमुख शहरांच्या मुख्य गटात 3 शहरांचा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे.या 'सुपर स्वच्छ लीग' गटामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई, मध्य प्रदेशातील इंदोर आणि गुजरातमधील सुरत या तीन शहरांचा समावेश आहे. या तीन शहरांनी सातत्याने स्वच्छतेमध्ये अग्रक्रम राखला असून त्यांची स्वतंत्र कॅटेगरी निर्माण करण्यात आली आहे. नवी मुंबईकर नागरिकांच्या दृष्टीने ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असून या यशस्वी मानांकनाबद्दल महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आहे.नवी मुंबईचा स्वच्छ सर्वेक्षणातील 'सुपर स्वच्छ लीग' या नव्याने निर्माण केलेल्या विशेष गटात समावेश होणे ही आनंदाची गोष्ट आहेच, त्यासोबतच आपल्या सर्वांची जबाबदारी वाढवणारी बाब असून यापुढील काळात आपले स्थान उंचावत ठेवण्यासाठी सर्व नागरिकांचा शहर स्वच्छतेत अधिक आत्मियतेने व सक्रियतेने सहभाग आवश्यक असल्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सांगितले आहे.नवी मुंबईकर नागरिक नेहमीच स्वच्छता कार्यात अग्रेसर राहिले असून येथील स्वच्छतेबाबत वेळोवेळी दाखवलेली जागरूकता शहराच्या नावलौकिकात भर घालणारी राहिली आहे. त्यामुळे ‘सुपर स्वच्छ लीग’ या विशेष गटात समावेश झाल्यानंतर अधिक जागरुकतेने स्वच्छता वाढीवर भर देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सुपर लीगमध्ये समावेश झाल्याने स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये गुणांकनाचे स्वरुप बदलले असून आता 10 हजार गुणांचे मूल्यमापन आहे. त्या गुणांच्या वर्गवारीमध्ये प्रत्यक्ष दर्शनी स्वच्छतेला 1500 गुण, घन कच-यावरील शास्त्रोक्त प्रक्रियेकरिता 1500 गुण तसेच जनजागृती उपक्रमांकरिता 1500 गुण असणार आहेत. त्याचप्रमाणे वर्गीकृत कचरा संकलनाकरिता 1000 गुण, शौचालय व्यवस्थापना करिता 1000 गुण, सांडपाण्यावर प्रक्रिया करुन पुनर्उपयोगाकरिता 1000 गुण व माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन कचरा व्यवस्थापन सुधारणेकरिता 1000 गुण असणार आहेत. तसेच लोकांकडून प्राप्त तक्रार निवारणासाठी 500 गुण, मलनि:स्सारण प्रक्रिेयेकरिता 500 गुण आणि स्वच्छताकर्मीकरिता कल्याणकारी कामांसाठी 500 गुण अशाप्रकारे एकूण 10,000 गुणांनुसार सर्वेक्षण केले जाणार आहे. याशिवाय कचरामुक्त शहर मानांकनाकरिता 2500 गुण व ओडीएफ वॉटर प्लस मानांकनाकरिता 2500 गुण ग्राह्य धरले जाणार आहे.या सर्वेक्षणामध्ये शालेय स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जाणार असून स्वच्छ आणि कचरामुक्त शाळा, शाळांमधील कचरा वर्गीकरण आणि कंपोस्ट पीट्सचा वापर, विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व्यवस्था अशा विविध बाबींची बारकाईने पाहणी करण्यात येणार आहे.शहरातील पर्यटन स्थळे, स्मारके व परिसर स्वच्छता या बाबीही महत्वाच्या आहेत. शहर स्वच्छतेविषयी नागरिकांच्या अभिप्रायाकरिता विविध माध्यमांचा वापर केला जाणार असून प्रत्यक्ष ‘संवाद, स्वच्छता ॲप, माय गर्व्हमेंट ॲप, वोट फॉर माय सिटी ॲप आणि वोट फॉर माय सिटी पोर्टल’ अशी 5 माध्यमे सर्वेक्षणातील नागरिक प्रतिसादाकरिता 15 फेब्रुवारी नंतर उपयोगात आणली जाणार आहे.या अनुषंगाने सर्व अधिकारी, कर्मचारीवृंद यांनी ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे ध्येय साध्य करण्यासाठी संपूर्ण क्षमतेने सक्रिय व्हावे असे सूचित करीत महापालिका डॉ. कैलास शिंदे यांनी स्वच्छ सर्वेक्षणातील सुपरस्वच्छ लीग मधील आपला प्रवेश ही आपल्या आजवरच्या कार्याची पोचपावती असून हे मानांकन उंचावण्यासाठी नियोजनबध्द कृती आराखडयानुसार आपल्याला सोपविलेल्या जबाबदारीनुसार मुद्देनिहाय काम करावे असे आढावा बैठक घेत निर्देश दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड व सर्व विभागप्रमुख, विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता उपस्थित होते.स्वच्छतेमधील नवी मुंबईच्या आजवरच्या मानांकनात नवी मुंबईतील लोकप्रतिनिधी, विविध संस्था, संघटना, मंडळे, शाळा - महाविद्यालये, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, दिव्यांग, तृतीयपंथी नागरिक तसेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व सर्वच नागरिक अशा विविध समाज घटकांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. दैनंदिन शहर स्वच्छ ठेवणारे स्वच्छतामित्र व स्वच्छतासखी तसेच सफाईमित्र यांचे सर्वाधिक योगदान या मानांकनात आहे. या सर्वांचे अभिनंदन करीत यापुढील काळात शहराचे मानांकन उंचावण्यासाठी अधिक जोमाने काम करूया असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी व्यक्त केले आहे.