नवीन कायद्याचा वापर करुन देशामध्ये असलेला पहिला क्रमांक टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांपुढे आव्हान राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्व कटिबध्द - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवीन कायद्याचा वापर करुन देशामध्ये असलेला पहिला क्रमांक टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांपुढे आव्हान

राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्व कटिबध्द - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


ठाणे :- नवीन कायद्याचा वापर करुन देशामध्ये असलेला पहिला क्रमांक  टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांपुढे आव्हान असून राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्व कटिबध्द असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कम्युनिटी हॉल, रेमंड गेस्ट हाउस, जे.के.ग्राम ठाणे या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची परिषद 2025 संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र डॉ.संजय दराडे,  ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

              याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये फॉरेन्सिक व्हॅन उपलब्धता वाढवावी लागणार आहे. सीसीटीनीएस-2.2 आणि आयसीजीएस-2.2 यांचे ट्रान्सजिशन आहे. त्यामध्ये सिमलेस डेटा इंटिग्रेशन आणि डेटा ऑपरेटिंग झाले पाहिजे. याकरिता नेटवर्क कनेक्टिविटी वाढविली पाहिजे. दूरदृश्यप्रणालीद्वारे (सुधार सेवा) सुविधा जेल आणि प्रमुख ठिकाणी घेतलेली साक्ष ग्राह्य धरली जाते. त्या माध्यमातून क्युबिकल तयार केले पाहिजेत. या प्रणालीमुळे आरोपीला कोर्टामध्ये घेवून जाण्यासाठी होणारी मोठी कसरत कमी होणार आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक लॅबमध्ये नोटिफाईड एविडन्स सेंटर तयार करु शकतो. तिथूनच साक्ष पुरावे करु शकतो. डॉक्टरसुध्दा हॉस्पिटलमधून या प्रणालीचा वापर करुन साक्ष पुरावे करु शकतात. यासाठी लागणारा सर्व निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.ते म्हणाले, नवीन कायद्यामध्ये फॉरेन्सिक इनव्हेस्टिंगच्या संदर्भात मोठा जोर देण्यात आला आहे. फॉरेन्सिक एविडन्स आणि टेकनिकल एविडन्स आहे यावर भर देण्यात आला आहे. याकरिता सर्व पोलीस युनिटला टॅब देण्यात येणार आहे. एविडन्स रेकॉर्ड 100 टक्के झाले पाहिजे, असा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. नवीन कायद्याचे पालन करताना आपल्या 100 टक्के फॉरेन्सिक व्हिजिट करणे देखील अत्यंत महत्वाचे आहे. या अगोदर प्रलंबित असलेल्या केसेस संपवायच्या आहेत. याकरिता बाह्यस्त्रोताद्वारे मनुष्यबळ उपलब्ध करुन घ्यावयाचे आहे. त्यांना विशिष्ट प्रशिक्षण द्यायचे आहे. नवीन कायद्यानुसार चार्जशीट वेळेवर दाखल झाली पाहिजे. आतापर्यंत 90 टक्के लोक प्रशिक्षित झाली आहेत. आपणाला 100 टक्के लोक प्रशिक्षित करावयाची आहेत. ई-समन्स व्हॉट्सअपवर देखील बजावता येवू शकतो. त्याची डिजिटल प्रिंट आपल्या रेकॉर्डला ठेवायची आहे. आपल्याकडे आलेल्या केससचे मॉनिटरिंग करुन त्याची कार्यवाही विहित वेळेत करणे आवश्यक आहे. विविध केसेस अंतर्गत पोलीस स्टेशनमध्ये जप्त केलेली संपत्ती मोठया प्रमाणावर पडून राहते. नवीन कायद्यातील तरतुदीनुसार ज्या केसेसची कार्यवाही पूर्ण झाली आहे,   अशा केसेस मधील जप्त केलेली संपत्ती पुढील 6 महिन्यांमध्ये मध्ये संबंधितांकडे सुपूर्द केली जाईल. तपासकामामध्ये जमा केलेला मुद्देमाल ज्या कक्षामध्ये ठेवला जातो त्या कक्षाचे अत्याधुनिकरण करण्यात येणार आहे.नवीन कायद्यामध्ये दोन पेक्षा अधिक ॲडजरमेंट घेता येणार नाही. सरकारी वकिलांना याबाबत अवगत करावे. दोनच्या वर ॲडरजमेंट मागितल्यास त्यास आक्षेप घेण्यात यावा, असे सांगून ते पुढे म्हणाले की, कनविक्शन रेट संदर्भात पुन्हा सर्व पोलीस युनिट सोबत बैठक सुरु करणार आहोत. याकरिता डॅशबोर्ड तयार करण्यात येणार आहे. गृह आणि पोलीस विभाग यांनी साक्षीदार सुरक्षा स्किम राबवयाची आहे. ई-समन्स बजावताना विहित मार्गाने नोंदणी झाली पाहिजे. टॅब मिळेपर्यंत पोलिसांनी त्यांच्या स्वत:च्या फोनचा वापर केला तरी चालणार आहे. यशस्वी तपासाबाबतच्या यशकथांना प्रसिध्दी दयावी. 1945 आणि 112 हे  हेल्पलाईन नंबर सर्वत्र प्रसिध्द करावेत. शासनाने महासायबर सेंटर तयार केले आहे. सर्व युनिटने त्याचा लाभ घेतला पाहिजे. याकरिता एआय प्रणालीचाही वापर करायला हवा. नवीन कायदा लागू करण्यासाठी जनतेचा कायद्यावर विश्वास बसेल या गतीने कामे व्हायला हवीत.ड्रग्जमुळे समाजात उद्भवणाऱ्या गंभीर समस्यांविषयी चिंता व्यक्त करताना फडणवीस म्हणाले की, ड्रग्ज विरोधातील लढाई आपल्याला जिंकायची आहे. यासाठी गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक बसला पाहिजे, त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे.नक्षलवादाविरोधात पोलिसांनी चांगली कारवाई केली आहे.  तंत्रज्ञानाची  जी संसाधने उपलब्ध आहेत, त्याचा दैनंदिन कामकाजात जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे. याकरिता युनिट तयार करुन त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिले पाहिजे. पोलीस भरतीमध्ये सायबर नॉलेज असलेल्या उमेदवारांचा याकरिता उपयोग करुन घेता येवू शकतो. शहरांमध्ये सेफ स्ट्रीट मोहीम हाती घेतली पाहिजे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे. बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली पाहिजे. सोशल मीडियाचा उपयोग आऊटरिच वाढविण्यासाठी केला पाहिजे. समाजमाध्यमांवर फेक गोष्टी पसरविणाऱ्यांवर वचक बसला पाहिजे. त्याचे मॉनिटरिंग योग्यरित्या झाले पाहिजे. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचे रक्षक म्हणून समाजातील सर्व घटकांशी एकरुप  झाले पाहिजे.18 वर्ष वयाखालील गुन्हेगारांचा वाढता ट्रेंड पाहता त्यांच्यावर व त्यांच्या म्होरक्यावर कडक कारवाई केली पाहिजे. महिलांकरिता फास्ट ट्रॅक कोर्ट अधिक सक्षमतेने कार्यान्वित करण्यात येणार आहेत. महिलांच्या अपहरणाच्या केसेस वाढत आहेत. त्याचे ट्रेकिंग झाले पाहिजे. ज्याला जबाबदारी दिली आहे, त्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्याने त्याचा अहवाल वरिष्ठांना कमीत कमी वेळेत सादर केला पाहिजे असे सांगून श्री.फडणवीस पुढे म्हणाले की, एमआयडीसी विभागात संवाद साधला जातोय. फेक माथाडी असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जावी. लोकांना धमकावून माल खरेदी करण्यासाठी जबरदस्ती करणाऱ्यांवर मग तो कुठल्याही पक्षाचा असो त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. कुठल्याही प्रकारची ब्लॅकमेलिंग सहन केली जाणार नाही. उद्योगांवर टाच येता कामा नये. पोलीस कल्याण योजनेमध्ये संवाद महत्वाचा आहे. संवाद नसल्यामुळे शिस्तीचे पालन होत नाही. त्यामुळे संवाद साधला पाहिजे. पर्सनल इंटरग्रिटी खूप महत्वाचे आहे. भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे. पारदर्शक कारभार झाला पाहिजे. आपण सर्वांनी टिम म्हणून काम केले पाहिजे. कामगिरीमध्ये महाराष्ट्र पोलीस हे देशामध्ये पहिल्या क्रमांकाचे पोलीस आहेत. नवीन कायद्याचा वापर राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी आपल्याला करावयाचा आहे.या परिषदेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विशेषत: जे 3 नवीन कायदे देशामध्ये तयार झालेले आहेत, त्या कायद्यांमधील  तरतुदींचे प्रत्यक्ष पालन महाराष्ट्रात कशा प्रकारे होवू शकते, या संदर्भातील सादरीकरण या परिषदेमध्ये झाले. महाराष्ट्रात जे महासायबर सेंटर तयार करण्यात आले आहे. सायबर गुन्हे रोखण्याकरिता त्या संदर्भातील सादरीकरण झाले. महिला व बालकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी  त्याचप्रमाणे अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता अतिशय कमी वेळेत आरोपपत्र कसे दाखल केले जाईल, या संदर्भातील चर्चा झाली. तसेच ड्रग्सच्या संदर्भात कशा प्रकारची कारवाई चाललेली आहे आणि कशा प्रकारची कारवाई केली पाहिजे,या संदर्भातील चर्चा झाली. उद्योगांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्यादृष्टीने आपल्याला काय करता येईल, यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यासोबतच फॉरेंन्सिक कॅपॅबिलिटी कशा प्रकारे वाढविता येईल, याचाही ऊहापोह सादरीकरणाच्या माध्यमातून करण्यात आला. यापुढे शासनाची ड्रग्सच्या संदर्भात झिरो ट्रॉलरन्स पॉलिसी असणार आहे. ड्रग्सच्या कुठल्याही प्रकरणात कुठलाही पोलीस सापडला तर त्याला निलंबित न करता थेट सेवेतूनच बडतर्फ करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.या परिषदेची प्रस्तावना करताना पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी या परिषदेचे महत्व विषद केले. या परिषदेच्या निमित्ताने अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी नवीन गुन्हेगार कायदा (New Criminal Laws) या विषयावरील, विशेष पोलीस महानिरीक्षक अस्वती दोरजे यांनी महिला व बालविरोधी गुन्हे (Crime against Women and Children) या विषयावरील, तर विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी सायबर क्राईम (Cyber Crime)   या विषयावरील, मुंबई सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी नार्कोटिक्स (Narcotics) या विषयावरील, महासंचालक (कायदा व तांत्रिक) एस.के.वर्मा यांनी फोरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर (Strengthening of Forensic Infrastructure) या विषयावरील तर अतिरिक्त पोलीस महासंचालक निखिल गुप्ता व नागपूर शहर पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी औद्योगिक विकासाकरिता सोयीसुविधा (Facilitation to Development and Industries )या विषयावरील सादरीकरण केले.त्याचप्रमाणे या परिषदेत पोलीस मॅन्युअलचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

------------------------------------------------------------------------------------------- 

राज्यस्तरीय पोलीस क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न

पोलिसांनी संघभावना आणि पारदर्शकतेने काम करावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


ठाणे :- पोलिसांनी संघभावना आणि पारदर्शकतेने काम करावे. तर पोलीस खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळविण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी, त्यासाठी शासन तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहील, सर्वतोपरी मदत करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिसांना आज येथे आश्वासित केले.येथील साकेत मैदान येथे आयोजित 35 व्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा दिमाखदार समारोप सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

           यावेळी गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे,  गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र डॉ.संजय दराडे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.समारोप सोहळ्याची सुरुवात विविध पोलीस खेळाडू पथकांच्या संचलनाने झाली. यावेळी महिला आणि पुरुष गटातील 100 मीटर धावण्याच्या अंतिम स्पर्धाही पार पडल्या. विजेत्या खेळाडूंना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस खेळाडूंना प्रोत्साहन देताना सांगितले की, या स्पर्धांमध्ये राज्यभरातील 2 हजार 929 पोलीस खेळाडूंनी सहभाग घेतला, ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. अशा क्रीडा स्पर्धांमुळे पोलीस दलातील संघभावना अधिक बळकट होते. यापुढेही जास्तीत जास्त पोलीस खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा. महिला खेळाडूंची वाढती संख्या पाहून मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आणि कर्तव्य व क्रीडा या दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.ते म्हणाले, पोलीस खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील यश मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आपली प्रतिभा दाखवण्याची ही एक उत्तम संधी आहे. ऑलिम्पिकसह सर्वोच्च स्तरावर आपले पोलीस खेळाडू स्पर्धा करू शकतील, यासाठी शासन सर्व प्रकारचे आवश्यक ते सहकार्य नक्कीच करेल. यानुषंगाने 2036 च्या ऑलिम्पिकसाठी भारताच्या तयारीमध्ये पोलीस संघांना समाविष्ट करण्यासाठी "मिशन ऑलिम्पिक" सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस दल देशातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून ओळखले जाते आणि त्याचा नावलौकिक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि महाराष्ट्राला आघाडीचे औद्योगिक केंद्र म्हणून मदत करण्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशंसा करुन राज्य पोलिसांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यावसायिकता आणि कामगिरीचा "मानदंड" प्रस्थापित केला आहे, असे त्यांनी शेवटी सांगितले.महाराष्ट्र पोलीस दलाचा सन्मान आणि कर्तव्यदक्षता अधिक दृढ करण्याचा हा उत्सव यशस्वीरित्या संपन्न झाला.याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि पंकज भोयर यांचा पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या दिमाखदार सोहळयाचे उत्साहपूर्ण असे सूत्रसंचलन सचिन देवडे व श्वेता हुल्ले यांनी केले.

Popular posts
पत्रकारांच्या हक्कासाठी लढणे ही संघटनांची जबाबदारी , कोकण विभागीय पत्रकार अधिवेशन 2025 मध्ये आवाहन
Image
*स्वच्छ सर्वेक्षणातील 'सुपर स्वच्छ लीग' या नव्याने समाविष्ट विशेष कॅटेगरीत, देशातील तीन शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश - महाराष्ट्रातील एकमेव शहर*
Image
नवी मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी की वसुली अधिकारी ?, एपीएमसी मधील मार्जिनल स्पेस धारकांकडून केली जाते ७ ते ८ लाखांची प्रतिमहिना वसुली ?, अधिकाऱ्यांकडून कारवाई कमी आणि सेटलमेंट जास्त होत असल्याची चर्चा ?
Image
लोकमान्य मधील बातमीची दखल घेत दारावे गावातील अनधिकृत इमारतीवर सिडकोकडून तोडकं कारवाई , करावे गावातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासक परेश पटेल व जितेंद्र मढवी यांच्या इमारतीवरही पडणार लवकरच हातोडा, दारावे गावातील कारवाई नंतर करावे गावातील अनधिकृत बांधकामे सिडकोच्या रडारवर ?
Image